Friday 28 March 2014

वाचू आनंदे ..

परवा कपाटात जपून ठेवलेल्या वि. स. खांडेकरांच्या 'ययाती' पुस्तकावरची धूळ झटकली तेव्हा काही जुन्या आठवणी मनात दाटून आल्या.  निमित्त होत मैत्री कट्यातर्फे  चालू होणाऱ्या   वाचनालयाच  . . 

लहानपणी किती पुस्तक वाचली असतील याचा हिशोब लावण कठीण आहे खरोखर पुस्तकांच्या विशाल ,सुंदर पण स्वप्नाळू जगात मी वाढले.सुखवस्तू पांढरपेशांच्या टीचभर जगात वावरले. आई बाबांनी खूप आधुनिक सुखसुविधा दिल्या असे नाही ,पण एक मात्र खर, त्यांनी विचार दिले. बुद्धीच्या निकषावर माणसाने प्रत्येक गोष्ट घासून पाहायला हवी ही  संकल्पना दिली . अगदी लहान असल्यापासून ते दोघ मला या पुस्तकांच्या राज्यात घेऊन गेले . .  वर्तमानपत्रातले छोटे लेख ,कविता गोष्टी या साऱ्याची ओळख करून दिली . पोट धरून हसायला लावणारे पु.ल , मराठी मातीचा जाज्वल्य अभिमान वाटायला लावणारे श्रीमान योगी अर्थात शिवाजी महाराज याच राज्यात भेटले . कर्णाची अगतिकता सांगणारे राधेयाकार रणजीत देसाई ,पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हण सांगणारे कुसुमाग्रज,. भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही असे सांगणारे वि.स.खांडेकर इथेच भेटले . हे पुस्तकांचे जगच निराळे. आई बाबांनी दिलेले हे शब्दरूपी धन मी सतत जपून ठेवले . आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ह्या पुस्तक रुपी मित्रांनी मला  चांगली  साथ दिली. 

पण आता  काळ बदलला आहे  ,आधुनुकीकारणाचा परिणाम माणसाच्या राहणीमानावर दिसू लागला आहे .  हळूहळू पुस्तकांची जागा TV आणि computer, mobile tablet  ने घेतली आहे . एकेकाळी वाचनालयात गर्दी करणारे आबालवृद घरीच ह्या नव्या करमणुकीच्या साधनात आपला आनंद शोधू लागले आहेत. एकेकाळी उन्हाळ्याची सुट्टी लागली की वाचनालयात वळणारी पाऊले mall मध्ये , hotels मध्ये वळू लागली आहेत. Social networking sites ने तर  सगळ्यांच्या मनाचा ताबा घेतला आहे. मिळालेला प्रत्येक क्षण mobile ची बटणे दाबून लोकांच्या आयुष्यात डोकावण्यात वाया जाऊ लागला आहे. ह्या सगळ्या गोंधळात पुस्तक रुपी मित्र कुठे तरी हरवला आहे.एके काळी शहराचा अविभाज्य घटक असणारी ,शहराचा सांस्कृतिक वारसा जपणारी वाचनालय आता दुर्मिळ झाली आहेत .

तुम्ही म्हणाल नाही वाचली पुस्तक , नसली वाचनालय काय फरक पडतो ??? माहितीच हवी असेल तर सर्वज्ञ google ,wiki pedia  आहेच कि सेवेला.त्यासाठी पुस्तकाचा भार का सहन करा? वाचनालयात जाऊन पुस्तकमित्रांना भेटण्यापेक्षा facebook ,whatsapp वर मित्रांशी बोललेले काय वाईट आहे? खर आहे त्यात वाईट काहीच नाही. पण याचा  विचार करा या google ,wikipedia ने आपण आपली सारासार विचार करण्याची शक्तीच तर हरवून बसलो नाही ना ??/ facebook  आणि whatsapp च्या आभासी दुनियेत आपण ऋणानुबंध जपणारे समविचारी मित्र तर हरवून बसत नाही ना ?

या सगळ्या पार्श्वभूमीवर मैत्री कट्ट्यातर्फे चालू होणाऱ्या वाचानालायाचा  उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे. रणजीत देसाई च्या स्वामीपासुन  ते चेतन भगतच्या Revolution २०२० पर्यंत ,बालकवींच्या फुलराणीपासून ते सौमित्रच्या गारवापर्यंत ,सानेगुरुजींच्या श्यामची आईपासून ते दिलीप प्रभावाळंकरांच्या बोक्यासातबंडे पर्यंत , George Orwell च्या Animal farm पासून ते Dan Brown च्या Da vinci पर्यंत , अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा आस्वाद सगळ्यांना घेता  येईल. पुस्तकप्रेमी मित्रांना भेटण्याची , चागल्या विचारांची देवाण घेवाण करण्याची संधी हे वाचनालय आपल्याला उपलब्ध करून देईल अशी अशा वाटते. कट्ट्यातर्फे सुरु केल्या जाणाऱ्या  ह्या उपक्रमाद्वारे आपण आपल्या सोसायटीमधल्या लेखक कवीना त्यांची कलाकृती सगळ्यांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध करून देवू शकलो तर किती छान होईल . बालवाचकांसाठी पुस्तक वाचनाचा कार्यक्रम , चांगल्या पुस्तकावर पुस्तकप्रेमींची चर्चा असे प्रोत्साहन पर कार्यक्रम सादर करून निर्मळं  आनंदाचा आस्वाद आपल्याला घेता येईल .

आपापसातील वैयक्तिक मतभेद दूर ठेऊन जर सगळ्यानी अशा स्तुत्य उपक्रमासाठी एकत्र कार्य केले
तर , आज रोवलेल्या ह्या वाचनालयाच्या बीजामधून फोफावणाऱ्या  वटवृक्षाची सावली आपली पुढची पिढी अनुभवू शकेल आणि आपण दिलेल्या वाचन संस्कारांसाठी आपली कायम ऋणी राहील.