Friday 14 July 2017

साठवण

शाळेचा निरोप समारंभ हि आयुष्यात न विसरता येण्यासारखी गोष्ट. १० वी च वर्ष असत. शाळेच्या उबदार पंखाखाली विसावलेले आपण काहीसे स्वप्नाळू झालेलो असतो . महाविद्यालयाची रंगीबेरंगी स्वप्न डोळ्यापुढे तरळत असतात. बरेचसे तणावाखाली असतो  किती मार्क मिळतील आणि आपण पुढे जाऊन कोण होणार या आणि अशा अनेक विचारांनी मनाला एक विलक्षण हुरहूर लागून राहिलेली असते.  आणि त्याच वेळी मन खूप हळवं झालेलं असत. शाळेच्या रोजच्या एका सुरक्षित वातावरण येण्याची सवय असते आपल्याला.

१० वीच्या निरोप समारंभाच्या  वेळीस माझ्या मनात नेमक्या याच भावना होत्या. आतापर्यंत घट्ट धरून ठेवलेले मैत्रिणींचे हात आता  सुटणार होते .डोळ्यात खूप स्वप्न होती . .आणि अशा वेळीस समोर प्रमुख पाहुणे म्हणून समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलायला उभे होते लेखक कवी प्रवीण  दवणे . सर खूप सुंदर बोलले त्या दिवशी. शाळेविषयी, आयुष्यातील नवीन येऊ घातलेल्या बदलाविषयी , मैत्रीविषयी. आयुष्य भरभरून जगायला शिका .नुसतं शिक्षण घेऊ  नका   माणूस घडवायला शिका. असं काहीस छानस . मला आठवतंय  घरी आल्यावर देखील मी कितीतरी वेळ आई बाबाना त्या  भाषणाबद्दल सांगत होते. मराठी पुस्तक वाचायची आवड होती. घरी ' विवेक ' हे साप्ताहिक  यायचं त्यात प्रवीण दवणे सरांचे  लेख असायचे. पण प्रत्यक्ष त्यांना बोलताना बघणं आणि त्यातलं सगळं साठवून ठेवणं हा एक विलक्षण अनुभव होता.


आता हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी जुई  जिथे कथक शिकते त्या स्वानंद कला प्रसारक  केंद्राचा एक कार्यक्रम होता. ध्यास स्वप्नपूर्तीचा . विविध क्षेत्रात  एखाद्या गोष्टीच्या ध्यास घेऊन शून्यातून विश्व्  उभं करणाऱ्या काही महान व्यक्तीच्या कार्याचे स्मरण या कार्यक्रमात केले जाणार होते तसेच कथकचे शिक्षण  घेणाऱ्या मुलींना देखील या कार्यक्रमातुन  प्रेरणा मिळावी असा एक छान हेतू होता. तर  या  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले होते  'प्रवीण दवणे  सरांना.  हा तर दुग्ध शर्करा योग होता . आणि त्याहून अत्यंत छान गोष्ट अशी होती कि  जुई आणि तिच्या सोबत  कथक शिकणाऱ्या स्नेहा काकू  यांना निवेदनाची जबाबदारी दिली होती.  जेव्हा ताईने आम्हाला हे सांगितले तेव्हा मला खूपच छान वाटले. एक कालचक्र पूर्ण झाल्यासारखं वाटले .

सर्वात कठीण गोष्ट होती सर्व निवेदन लिहून काढण्याची. ओघवत्या भाषेत स्वच्छ  शब्दात त्यांच्यासमोर सादर करण्याची. सरांची काही पुस्तकच मदतीसाठी धावून आली.

मधल्या काळात खरतर सरांची पुस्तक मी अजिबातच वाचली  नव्हती. प्रामाणिकपणे सांगायचं तर  आता एवढं अलंकारिक मराठी  वाचायची सवय सुटली होती. मध्ये बाबानी त्यांच्या लायब्ररीतलं सरांचं  एक पुस्तक दिल होत . तेवढच काय ते


घरात जुईच्या मराठी वाचनाचा तसा आनंदच होता. जुईच्या मराठी वाचनाची धाव  फक्त बोक्या सातबंडे  तोतोचान  गोट्या  आणि तत्सम पुस्तकांपर्यंत .

 पण मग निवेदन लिहून काढलं  दोन चार वेळा छान प्रॅक्टिस  देखील झाली.  मला काही कारणास्तव काही वेगळे कार्यक्रम आधीच ठरलेले  असल्यामुळे जुईच्या या कार्यक्रमाला पूर्ण वेळ जाता आले नाही. कार्यक्रमाचा पूर्वार्ध बुडाला होता. त्यामुळे सरांचं व्याख्यान काही ऐकता आले नाही.  धावत धावत हॉल वर पोचले तेव्हा आभार प्रदर्शनाचा  कार्यक्रम चालू होता . नंतर काही नृत्य आणि जुईची दोन चार निवेदन ऐकता आली.

कार्यक्रम संपला मात्र मी जुईला घेऊन सरांकडे गेले. मनात काही वेगळ्याच भावना दाटून आल्या होत्या. सरांची काही पुस्तके विक्रीसाठी ठेवली होती त्यातलं एक पुस्तक विकत घेतलं. त्यावर सरांची स्वाक्षरी घेतली. त्यांनी जुईचे कौतुक केलं छान बोलली म्हणाले. खूप अभिमान   वाटला .

मराठी देखील वाचत जा  म्हणाले . आम्ही दोघीनी हसून  मान  डोलावली.

हॉल मधून बाहेर पडले . मन एका वेगळ्याच जगात जाऊन पोचले होते. खूप प्रसन्न वाटत होते. आयुष्यात काही गोष्टी  देव न मागता देतो याची प्रचिती आली त्या दिवशी. रात्र झाली होती  जुईचा हात हातात होता. पावसाची रिपरिप चालूच होती. मला काही वर्षांपूर्वीची ती निरोप समारंभाची संध्याकाळ आठवली शाळेच्या निरोपाची, सरांच्या व्याख्यानाची. मधली काही वर्ष जणू पुसून गेल्यासारखी. मी जुईकडे बघितलं तर ती खूप दमली होती पण खूप आनंदात  दिसली . सर कसे बोलले काय बोलले  हे तिच्याकडून जाणून घेण्याची मला इच्छा होती. सर चांगले बोलले  म्हणाली.   एका जागी साठून राहिलेलं डबक्यातील पाणी आणि खळाळणारा निर्झर   यांची मानवी स्वभावाशी केलेली एक छान तुलना   मात्र तिला छान समजली  होती तिने ती तशीच्या  तशी मला सांगितली. 
जे भारावलेपण  मी अनुभवलं  , जेवढं प्रेम  मराठी भाषेवर आम्ही केलं तेवढं जुई करणार नाही कदाचित  पण सरांच्या आजच्या व्याख्यानाच मर्म तिला  थोडं कळून चुकलं होत.  माझं व्याख्यान चुकलं होत पण जिच्यावर ते संस्कार व्हायची  गरज  होती तिला ते थोडं फार  का होईना पण कळलं होते.
भाषा हे खरतर माध्यम असत आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचं. प्रत्येक भाषेचं स्वतःच एक  सौन्दर्य  असत एखादी  व्यक्ती मनापासून बोलत असली कि त्या भावना समोरच्यापर्यंत नक्कीच पोचतात.

 मराठी भाषेचं  बोट पकडून आम्ही शिकलो. जिने आम्हाला ज्ञात केलं आम्हाला  घडवलं. या भाषेची अवीट गोडी  अधिकच सुंदर करणाऱ्या पुस्तकांवर पण आम्ही मनापासून प्रेम केलं. या पुस्तकातून सुंदर शब्दातून प्रेरणादायी ठरणाऱ्या  अशा असंख्य लेखकांना मी मनातल्या मनातच हात जोडले.


(ता.क.  अशी छान  संधी जुईला दिल्याबद्दल स्वाती  ताईची मी मनापासून आभारी आहे) 











1 Comments:

At 14 July 2017 at 11:22 , Blogger Unknown said...

खूप छान लिहिलं आहेस😊👌

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home